Friday, September 16, 2022

हिरकणी

"काय गं काय ठरवलंस? आवडलाय का तुला काल आलेला मुलगा? त्यांचं स्थळ कागदोपत्री तरी छान वाटतंय. पण तसे तर सगळेच चांगले वाटतात. पण तुला आवडला पाहिजे मुलगा. तुलाच आयुष्यभर संसार करायचाय त्याच्याबरोबर. काय बोलतेय मी, रेवा? आहे का लक्ष?" "आई, मला नाही करायचंय गं लग्न इतक्यात. काय सारखी तुम्ही स्थळं आणता आणि काल तर कहरच केलाय तुम्ही. मला उशीर होतोय, मी चालले ऑफिसला, बाय!" "अगं, उत्तर तर दे, हो की नाही- एवढं तर सांग. तुला दुसरा कोणी आवडत असेल तर सांग तसं, हेही सांगितलंय ना तुला? तेही धड सांगत नाहीस तू. इथे बस थोडा वेळ. घरी आपण दोघीच आहोत आता, तर निवांत बोल थोडी माझ्याशी. आणि तुझी ट्रेन आठ अडतीसची असते, हे माहितीये मला. आहे अजून अर्धा तास." धुसफुसत रेवानी पायातली चप्पल काढली आणि पाय आपटत येऊन सोफ्यावर मान खाली घालून हाताच्या बोटांची चाळवाचाळव करत बसली. तिच्याकडे बघत अश्विनी विचारू की नको विचारू अशा संभ्रमात, मनातलं वादळ थोपवत शांत बसून राहिली. रेवा बोलायला सुरुवात करेल, अशी आशा ठेवणं फोलच होतं. शेवटी तिनंच चाचपडत सुरुवात केली. " रेवा, बाळा आतापर्यंत मी किंवा तुझ्या बाबानी कधीच तुझ्यावर कुठली जबरदस्ती केली नाहीये. आणि त्यात काही मोठेपणा नाहीये, अर्थातच. लहानपणापासून तुला हवे ते खेळ आणून दिले. तू मुलगी आहेस म्हणून अशीच वाग, असेच कपडे घाल, इतके वाजताच घरी ये असेही काही निर्बंध घातले नाहीत. तुला मेकॅनिकल इंजिनियरिंग करायचं होतं, केलंस. स्वतःच्या मेहनतीने चांगले मार्क्स मिळवून छानशी नोकरीही मिळवलीस. आता सव्वीसची होशील ह्या वर्षी. आम्हाला कायम चाकोरीबद्ध विचारात राहण्याची सवय आहे गं. एका विशिष्ट वयाच्या टप्प्यात शिक्षण, लग्न, मुलं व्हायायला पाहिजे, अशा विचारसरणीची आमची पिढी. पण सगळ्यांचं तसंच व्हयायला पाहिजे असं नाहीये नं. आता जागरूकता वाढतेय. थोडं-थोडं मी ही तुला समजून घ्यायचा प्रयत्न करतेय बाळा. पण तू बोल माझ्याशी, सांग मला तुला काय वाटतंय ते. तुला मुलांऐवजी मुली बघायला सुरुवात करू का आम्ही? की तुझी कोणी खास मैत्रीण असेल तर आण तिला घरी..." आईनी एवढा मोठ्ठा बॉम्ब टाकल्यावर रेवानी दचकून मान वर करून बघितलं. एक क्षण तिला वाटलं बोलून टाकावं सगळं मनातलं. एवढे पुढारलेले विचार आई कधी बोलू शकेल असं ह्या जन्मात तिला कधी वाटलं नव्हतं. पण तरीही तिला आपल्याबद्दल कसं सांगावं, ते रेवाला कळत नव्हतं. तिनं आईला उडवून लावलं,"काहीही काय बोलतेयस आई तू. अगं, लग्न नाही करायचंय सध्या म्हणजे काय मी लगेच लेस्बियन झाले तुझ्यासाठी! जरा इंटरनेट कमी वापरत जा. जगू देत मला स्वतंत्रपणे. लग्न झालं की ते सण-वार, सासरच्या पद्धती , जबाबदाऱ्या, नको बाई इतक्यात हे सगळं. चल, तुझ्याशी बोलण्यात माझी आठ-अडतीस निघून जाईल. पळते मी." असं बोलता बोलता ती सरसर जिना उतरून निघूनही गेली. अश्विनी मात्र ती गेल्याच्या दिशेने नुसती दिग्मूढासारखी बघतच राहिली. समीरशी ह्या विषयावर बोलणंच शक्य नव्हतं. त्याला हे असलं काही नैसर्गिक असतं हेच मुळी मान्य नव्हतं. त्याचीही काय चूक. एकंदरीतच लैंगिकता किंवा तत्सम त्याज्य विषयांवर बोलण्याची मानसिकताच नव्हती आजूबाजूच्या कोणाचीच. पण अश्विनी एच. आर. मध्ये असल्यानी तिला डायव्हर्सिटीबद्दल जाणीव होती. कोणाचीही लैंगिकता फक्त स्त्री आणि पुरुष अशा साच्यांमध्ये बांधता येत नाही. निसर्गात काळा आणि पांढरा असे दोनच रंग नसतात तर वैविध्य असतं. तसंच समलिंगी असणं, अलैंगिकता ही काही कोणाच्या प्रभावाखाली येऊन किंवा संगतीचा परिणाम होऊन झालेली तात्पुरती बाब नसते. वयाच्या तिसाव्या वर्षी हे सगळं पहिल्यांदाच ऐकल्यावर खूप सारे प्रश्न उमटले होते तेव्हा आणि परदेशातून आलेल्या कौनिसलरने शांतपणे सगळ्या प्रश्नांची संयमित उत्तरही दिली होती. घरी आल्यावर समीरशी ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्नही केला होता अश्विनीने, पण व्यर्थ! वीस वर्षांपूर्वी झालेले ते संवाद आजही बदललेले नव्हते. लहानपणापासून अश्विनीला रेवाचं वेगळेपण जाणवत होतं. काय आणि कसं ते नेमकं शब्दात नाही मांडता येणार, पण रेवा इतर मुलींसारखी नाही, हे तिला कुठे तरी आत खोलवर जाणवत राहायचं. ती वयात येताना, तारुण्यात पदार्पण करताना अश्विनीने कधीच तिला कोणाबद्दल हळवं होताना बघितलं नव्हतं. रेवा अभ्यासू आहे, तिचं संपूर्ण लक्ष तिच्या गोल्सवर असते, असं समीर अभिमानाने सांगायचा. तरीही अश्विनीला कुठं तरी काहीतरी खटकत राहायचं. तिला स्वतःचे मोरपंखी दिवस आठवायचे. कोणत्याही मुलानी आपल्याकडे बघून हसलं, बोललं की त्याच्या प्रेमात पडल्यासारखं वाटणं आणि तो नजरेआड होताच आपण ते विसरूनही जाणं. खरंच किती अल्लड वय असतं ते. तासन्तास आरशासमोर असतात मुली, मुलीच काय मुलंही! केसांचा झुपका काय काढतील, हजार वेळा गुळगुळीत दाढीच काय करतील, एक-एक प्रकार करून कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचे-कोणाला तरी प्रेमात पाडण्याचे ते दिवस. ते कॉलेजचे दिवस डोळे बंद करून दूध पिणाऱ्या मांजरासारखे असतात. मुलांना वाटतं की, आई-बाबांना काय कळतंय? पण ते विसरतात की , आई-बाबाही कोणे एके काळी ह्या सगळ्यातून गेलेले असतात. रेवा कॉलेजमध्ये गेल्यापासून अश्विनी तिच्याशी नेहमी मोकळेपणानी सगळ्या विषयांवर चर्चा करायची, तिची मैत्रीण बनण्याचा प्रयत्न करायची. तिच्या कुठल्या कुठल्या मित्रांवरून चिडवायचीही. पण रेवा नेहमीच उडवून लावायची. मग अश्विनीही तो विषय सोडून द्यायची. की जाऊ देत, हे दिवस अभ्यासाचेच आहेत. एक प्रकारे रेवा ह्या सगळ्याचा आता विचार करत नाहीये हे चांगलंच आहे. पण मग शिक्षण पूर्ण होऊन नोकरी सुरु झाली, त्यालाही आता चार-पाच वर्षं होऊन गेली. तरीही रेवा कोणाबद्दलच घरी काही सांगत नाही म्हंटल्यावर अश्विनीने आडून-आडून विचारून बघितलं. हिचं आपलं एकच- "इतक्यात लग्न कराय चं नाहीये मला..." सरते शेवटी पंचवीस पूर्ण झाल्यावर अश्विनी आणि समीर तिचं नाव नोंदवून आले. आधी आधी तर कोणत्याच स्थळाची माहिती तिला आवडायची नाही. हा काय भारताबाहेर राहतो, हा मुंबईतला नाहीये, ह्याचं शिक्षण किती कमी आहे, त्याला पगारच कमी आहे. एक ना दोन, काही ना काहीतरी कारण काढून ती स्थळं बाद करायची. शेवटी कंटाळून समीरने ठरवलं की आपल्याला आवडेल ते स्थळ सरळ घरीच बोलवायचं आणि बघायचा कार्यक्रम ठेवायचा. मग बघू रेवा काय करते ते. अश्विनीला खरं तर ते अजिबात पटलं नव्हतं. पण दोघंही बाप-लेक स्वतःचं खरं करणारे होते. त्यामुळे त्यांच्यापुढे अश्विनी वाद टाळायचा, म्हणून गप्पच बसायची. तर काल रात्री रेवा घरी आली तेव्हा मुलाकडचे घरी येऊन बसलेले. तिला काय बोलावं-करावं काही सुचलंही नाही. कसाबसा तो कार्यक्रम आटोपला. मुलाकडचे घरी गेल्यावर, रेवा कपडे बदलून काहीच ना बोलता झोपून गेली. समीरलाही त्याची चूक जाणवली असावी. तोही उद्या बोलू, आज झोपू देत तिला, असं म्हणून झोपायला गेला. अश्विनी मात्र रात्रभर टक्क जागीच राहिली. काही झालं तरी आता सोक्ष-मोक्ष लावायचाच, असं तिनं ठरवलं. इकडे ट्रेनमध्ये बसल्यावर रेवाचा विचार सुरु झाला. नक्की काय सांगू आईला-बाबाला? त्यांना कळेल का? लहानपणापासून त्यांना बोलताना ऐकलंय, "तुझ्या घरी बोलावशील ना आम्हाला?", "तू सासरी होऊन निघून जाशील गं आणि आम्ही बसू तुझी आठवण काढत..." "इथे आहेस तोपर्यंत लाड आहेत, नवऱ्यालाच कामाला लावशील असं दिसतंय तुझं ..." वरवर साधी-सरळ वाटणारी ही वाक्य कित्ती त्रास द्यायची मला. नाही करायचंय मला लग्न- ना मुलाशी ना मुलीशी! मला त्या दृष्टींनी आवडलंच नाही कधी कोणी! नाही म्हणता उगाच जगाला दाखवायचं म्हणून मीही मैत्रिणींमध्ये, "तो कसला हॉट आहे नं?", "भारी बॉडी बनवलीय यार त्यानी ..", अशा वाक्यांना दुजोरा देत राहायचे. पण हे असं त्यांना का वाटतं, हे कळलंच नाही कधी. २०१९ मध्ये ३७७ची बातमी आल्याने दबक्या वाजत सगळीकडे चर्चा सुरु झाली होती. मग एकदा कॅम्पफायरच्या वेळी मनाली आणि आहनानी त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं. तेव्हा किती वेगळं वाटलेलं. मग पुढचे काही महिने मुलींकडे बघून आपल्याला काही वाटतंय का हे चाचपडण्यात गेले. विचार कर-करून डोक्याचा भुगा व्हायायचा. मी नक्की कोण आहे, मला कोणीच का नाही आवडत तसं? मित्र-मैत्रिणी पोत्यानी आहेत पण कोणाबद्दलच आकर्षण का वाटत नाही? माझ्यासारखे दुसरं कोणी असेल का? की मला काही मानसिक आजार आहे? कोणाला सांगताही येत नाही आणि विचारताही येत नाही. कोंडी झाली होती मनाची. इंटरनेटवर सर्च करून करून शेवटी ह्याला अलैंगिकता म्हणतात. विषमलिंगी-समलिंगी जसे असतात तसेच अलैंगिकही असतात. ज्यांना नैसर्गिकतःच कोणाबद्दलच शारीरिक आकर्षण वाटत नाही. ते वाचून जीव भांड्यात पडला होता. जगभरात माझ्यासारखे हजारो आहेत हे वाचून मन शांत झालं होतं. ते कळल्यानांतर कोण काय बोलतंय, कोणाला माझ्याबद्दल काय वाटतंय हा विचार करणंच थांबवलं. सगळं सुरळीत चालू असताना मधेच आई-बाबानी लग्नाचं टुमणं सुरु केलं. इतके महिने तर स्थळांमध्येच खोट काढून मी वेळ काढत होते, पण काल तर त्यांनी सरळ मुलालाच समोर आणून उभं केलं! आईला आता सांगणं भागच होतं. नाहीतर ती भलतेच विचार करत बसेल. पण सांगू तरी कसं? असा विचार करता करता माटुंगा कधी आलं ते कळलंही नाही. ऑफिस गाठल्यावर सगळेच विचार बाजूला पडले. दुपारी आईचा मेसेज आला की, आज आपण दोघीच आहोत रात्री जेवायला. तर आपण आज मस्तपैकी चायनीज खायला बाहेर जाऊया. बाबा त्याच्या मित्रांबरोबर जाणार होता. बाबा जेवायला नसला की त्या दोघींचा हा ठरलेला बेत असायचा. मग पटापट कामं संपवुन रेवा घरी जायला निघाली. घरी लवकर जाऊन आईसाठी आणि तिच्यासाठी मस्तपैकी भरपूर आलं घालून तिनं चहा केला. तेवढ्यात अश्विनीही घरी पोहोचली. चहाच्या नुसत्या वासानंच तिचा दिवसभराचा क्षीण निम्मा कमी झाला. चहाचे घुटके घेता-घेता त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर रेवानीच विषय काढला. "आज सकाळी अर्धवटच बोलणं झालं नं." "हो नं, तुला जायची घाई होती ना..." "आई, एक विचारू? तू मला मुली आवडतात का, असं का विचारलंस?" "अगं, सहजच. तुला लग्न कराय चं नाही म्हणतेस, मुलं नाकारतेयेस तर म्हंटलं एकदा विचारून बघावं. तुला कोण आवडतं हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. तुला कोणीही आवडलं तरीही माझं तुझ्यावरचं प्रेम अजिबात कमी होणार नाहीये, हे माहितीये ना तुला? शेवटी तू खुश असावीस, एवढंच हवंय गं आम्हाला दोघांनाही ." "आणि कोणीच आवडत नसेल तर?" "म्हणजे?" "स्पष्टच बोलायचं झालं तर तुला LGBTQ+ बद्दल माहिती आहेच. पण त्यातल्या + बद्दल काय माहितीये?" ह्यावर अश्विनी निरुत्तर झाली. आपण पुढारलेले आहोत, आपल्याला डायव्हर्सिटीबद्दल माहिती आहे, ह्याचा वाटणारा फाजील आत्मविश्वास एका क्षणात गळून पडला. "फारशी नाही गं माहिती. तू समजावून सांग नं मला.." "कुठून सुरुवात करू? जगभरात २३च्या आसपास वेगवेगळ्या सेक्शुऍलिटीज आहेत. आपल्या भाषा अजून समृद्ध होतायेत. एवढी विविधता असते निसर्गात, जी अजून माणसांना शब्दबद्ध करताही आली नाहीये. तर त्या + मध्ये असेक्शुअल म्हणजेच अलैंगिक असाही प्रकार असतो, हे ऐकलेलंस का?" खटकन ट्यूब पेटावी तशी अश्विनी वीस वर्षांपूर्वीच्या त्या सेमिनारमध्ये जाऊन पोचली. त्यात काहीतरी उल्लेख होता खरा. "हो गं, अंधुक ऐकल्यासारखं आठवतंय. म्हणजे ज्यांना शारीरिक आकर्षण वाटत नाही तेच ना?" "हो, बरोबर. तसंच. पण त्यातही खूप व्हेरिएशन्स असतात. म्हणजे अशी माणसं प्रेमात पडू शकतात, लग्नही करू शकतात. पण त्यांचं नातं खूप वेगळ्या लेव्हलचं असू शकतं गं. ते तू म्हणतेस नं, व्यक्ती तितक्या प्रकृती, तसंच! त्यामुळे अगदी हताश होऊ नकोस. मी खूप खुश आहे माझ्या आयुष्यात. आणि पुढे मागे मी कदाचित लग्नही करीन किंवा नाहीसुद्धा करणार. पण त्यानी काहीच फरक पडत नाहीये मला!" अश्विनी सुन्न झाली. मनावरचं मळभ हळूहळू दूर होत होतं. रेवा हळूच तिच्या मांडीवर डोकं ठेवून कुशीत शिरली. सवयीनं अश्विनी तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. मणा-मणाचं ओझं उतरून हलकं-हलकं वाटत होतं आता रेवाला. ह्यापुढचा प्रवास सोपा नसला तरीही त्यासाठी सज्ज होणं भाग होतं. रेवा तर मोकळी झाली होती पण अश्विनी मात्र हादरून गेली होती. हा समाज मुलींसाठी किती निष्ठूर होऊ शकतो हे तिनं स्वतः अनुभवलं होतं, अनुभवत होती. त्यात रेवाच्या नशिबी काय भोग असतील? इतकी वर्ष तिनं कसं सहन केलं असेल? नकळत तिचे डोळे पाझरू लागले. पण आता रडून उपयोग नव्हता. अश्विनीनं हलकेच रेवाला उठवलं. देवाजवळ दिवा लावला आणि देवाकडे हजार हत्तीचं बळ मागितलं. रेवाला तिच्या निर्णयात समर्थपणे साथ देऊन प्रत्येक पावलावर येणाऱ्या अडथळ्यांपासून वाचवण्यासाठी, तिला समजून घेऊन वर्षानुवर्ष बघत असलेल्या तिच्या भविष्याबद्दलच्या स्वप्नांना बदलण्यासाठी! तिच्यातली हिरकणी आता जिद्दीने वाटेत येणारा प्रत्येक गड सर करण्यास सज्ज होत होती.

Thursday, June 9, 2022

आतूर

   


 

        आज-काल फक्त तुझाच विचार असतो मनात. कधी एकदा तुला भेटतेय असं झालंय. तुझ्या नुसत्या आठवणींनीही अंगावर काटा फुलून येतो. स्वतःशीच मी हसू लागते आणि आजूबाजूच्यांना मला चिडवण्याचं जणू निमित्तच मिळतं. तू आलास की हे करू, ते करू असं मी वर्षभर ठरवत राहते. तू आलास की, तुझ्याबरोबर लांबवर बाईकवर भटकायला जायचंय. माहितीये की, तुझ्याबरोबर बाईकवर भटकायचं स्वप्न पूर्ण होणार नाहीये. तरीही वेडं मन अजूनही आशा ठेवून आहे. बाईक नाही तरी निदान लॉन्ग ड्राईव्हवर जाऊया, आणि गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून जगाची पर्वा न करता दोघंच डोळ्यात डोळे घालून हरवून जाऊया. तू माझ्याबरोबर असलास ना की, वाफाळणारा टपरीवरचा चहा सुद्धा अगदी अमृततुल्य होऊन जातो.

 महिने, आठवडे करत काही दिवस येऊन ठेपलेत. तुझ्या येण्याची चाहूल जरी लागली नं तरीही मला आपसूकच कळेल. तुझ्याआधीच तुझा गंध जीवाला वेडापिसा करेल. आणि मग ती आतुरता माझ्या रंध्र-रंधातून पाझरू लागेल. तुला जाणवतेय का रे माझी तगमग?

     तू येशील नं तेव्हा मी जगाचा शिरस्ता पाळून दुरूनच तुझ्याकडे पापणी लववत बघत राहीन. पण मला माझाच भरवसा नाहीये. तू समोर आलास की, मी धावत धावत येऊन तुला घट्ट मिठीत घेईन पण तूही दुष्ट आहेस,काही कळायच्या आधीच कदाचित तू माझ्या मिठीतुन हळूच निसटून जाशील. तू भेटलास की नुसता भासच होता, ह्या विचारांनी मग अजूनच जीवाची काहिली होईल. पण त्या पुसटत्या भेटीनी तू पुन्हा पुन्हा येऊन मला चिंब चिंब भिजवणारा आहेस, ह्याची मला खात्री पटवशील. ये रे लवकर, नको आता ताटकळत ठेवूस.

 - पावसाची आतुरतेने वाट बघणारी पक्की मुंबईकर!

 

Monday, June 6, 2022

दिल है हिंदुस्थानी- वढाळ मन!

 

    उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचं ठरलं की, आधी कोण-कोण येणार आहे ह्याची यादी होते. व्हॅट्सऍपवर एक ग्रुप केला जातो.  सगळ्यांच्या सुट्ट्या, बायकांच्या माहेरी जायचे दिवस, मोठ्या आजीकडे जमायचे दिवस सगळ्याचाच ताळमेळ घालायचा असतो. मोठया आजीला सगळे मोठी आजीच म्हणतात. आजोबा सगळ्या भावंडांत मोठे, त्यामुळे त्यांना मोठे आबा, आणि आजीला मोठी आजी म्हणूनच हाकी मारली जायची.

    सगळ्यांच्या सोयींनी एक दिवस ठरतो भेटीचा.  प्रत्येकाची वेगळीच तर्हा. कोणी हॉल बुक करायचा सुचवतं तर कोणी रिसॉर्ट! कोणाला लग्नाच्या पंगतीचा मेनू ठेवायचा असतो तर कोणाला चाट. कोणी म्हणतं सगळं बाहेरून मागवू, म्हणजे गप्पा मारता येतील तर कोणी सगळे मिळून गाणी ऐकता-ऐकता उकडीचे मोदक करायचा घाट घालतं. शेवटी सगळ्यात उत्साही चंदा मावशी हातात दोऱ्या घेते. तुम्ही सगळ्यांनी ठरलेल्या दिवशी माझ्याच  घरी या, मोठी आजी दमलीये आता. तिलाही जरा आराम मिळेल. बाकी सगळं मी बघून घेईन. चंदा मावशीकडे जायचंय म्हंटल्यावर मागच्या वेळी तिच्याकडे कशी धम्माल केलेली त्याचे किस्से रंगतात. मग एक दादा कोणते-कोणते खेळ खेळायचे त्याची जबाबदारी घेतो, एखादी ताई सगळयांसाठी छोट्या-छोट्या भेटवस्तू आणायचं ठरवते.

    बघता-बघता भेटीचा आठवडा येतो. पुढे-मागे करत सगळे गावी जमतात. गावी कोणी मोठ्या आजीकडे, कोणी मावशीकडे, कोणी मामाकडे उतरतं. चंदा मावशीकडे सगळे जमतात. तिनी सगळ्यांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवून साधाच पण रुचकर स्वयंपाक ठरवलेला असतो. मग उरलेल्या स्वयंपाकात सगळेच हातभार लावतात.  कोणी कोशिंबीर करतं, कोणी पापड-कुरडया तळायला घेतं. हसत-खेळत जेवणं होतात. ठरलेले खेळ सुरु होतात, पण तोपर्यंत मोठ्यांच्या डुलक्या सुरु झालेल्या असतात. मग घोरण्याची जुगलबंदी सुरु व्हयायच्या आत मुलं पडवीत सटकतात, पत्यांचे डाव रंगतात.

    संध्याकाळचा चहा-गप्पा संपता संपत नाहीत. पण आता जायची वेळ झालेली असते. सगळ्यांचेच पाय जड झालेले असतात. मोठ्या आजीनी, चंदा मावशीनी, मामींनी वानोळा भरून दिलेल्या पिशव्या सांभाळत निरोप घेतला जातो. निघताना, "आता एकदा शांतपणे भेटू आमच्या घरी, वेळ काढून या. मग जरा गप्पा तरी होतील." इतका वेळ काय चाललेलं  मग? मुलं एकमेकांना डोळ्यांनीच खुणावतात.

 

उन्हाळयाच्या दिवसात बहुतांशी परदेशात स्थायिक झालेले माझ्यासारखे भारतीय सुट्टी काढून भारतात जातायेत, जाणार आहेत किंवा ठरवतायेत. त्या सगळ्यांच्याच मनात भारतात जायच्या आधी अशा आठवणींचं माहोळ उठलेलं असतं. लहानपणच्या आठवणींनी मन केव्हाच तिकडे पोहोचलेले असते. भारतात पोहोचलं की, काळाच्या खुणा चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमधून आणि थकलेल्या हालचालींमधून जाणवतात. पण मनात अजूनही कंबर कसून सगळ्यांचं उत्साहानी करणारी आई असते, केसांना थरथरत्या हातानी तेल लावून देत "काय वाट लावलीस ग केसांची..."असं म्हणणारी काळाच्या पडद्या आड गेलेली आजी असते. एकत्र जमून सासरी सगळ्यांनी केलेली धम्माल असते, जी आता काळानुसार होणार नसते. सगळ्यांना एकत्र भेटलं तरीही, "तू घरी आलीच नाहीस, एकदा ये वेळ काढून." अशी प्रेमळ तक्रारही होणार असते. आणि त्या तक्रारींसाठी, वेळ जमवून भेटण्यासाठी, हक्कानी भांडण्यासाठी, लाड करून घेण्यासाठी आणि काही जणांना कदाचित शेवटचं भेटण्यासाठी वढाळ मन  आतापासूनच भरून आलेलं असतं.

#proudToBeIndian

Wednesday, May 25, 2022

हेअरकट



पॅंडेमिकनी सर्व प्रकारची आत्मनिर्भरता शिकवली, तरीही पार्लरमधे जाऊन केस कापून घेण्याची हौस काही गेली नाही. तिथे जाऊन कॅटलॅाग बघून हजार फोटो बघून शेवटी, “बघ माझ्या चेहर्याला सुट होईल असा हेअरकट कर तुझ्या आवडीनी…”, असं म्हणून “जिच्या हाती कात्री ती केसाते उद्धारी”, ह्या उक्तीनुसार विश्वासाने डोळे मिटून शांतपणे मी बसून राहते. तास-दोन तास माझ्या केसांची कशी वाट लागली आहे, आणि किती हजारांचा चुरा करण्याची गरज आहे, हे शांतपणे ऐकून घेते. पार्लरवाली, “मी होते, म्हणून तुला जगबुडीपासून वाचवलंय!”, ह्या आविर्भावात DONE! अशी घोषणा करते. मग पुढच्या वेळी येऊन हेअर स्पा करून घेण्याच्या पोकळ आश्वासनावर मी पर्स हलकी करून घरी येते.
घरी आल्यावर वीस वर्षांच्या नवर्याकडून (लग्नाला वीस वर्षं झालीयेत, नवर्याला नाही हे सुज्ञांस सांगणे न लागे) फक्त दोनच प्रतिक्रीयांची अपेक्षा असते. “हे काय, पार्लर बंद होतं?” किंवा, “ह्या वेळी काय- बालभी कटे और पताभी नही चला? ह्यॅ ह्यॅ…” अशा विनोदांवर माझ्याकडून टाळीची अपेक्षा!! ह्या व्यतिरीक्त तिसरी कुठली प्रतिक्रीया असते का? 😆

पोळी?

 


नविनच संसाराची सुरूवात. त्यात सासर परगावचं, त्यामुळे राजा-राणीचा संसार. इतके दिवस तो बॅचलर म्हणून राहत असल्याने घर तसं रिकामंच. तिनं हौशीनं घर लावायला सुरूवात केली. आईला विचारत विचारत महिन्याची किराणा यादी आयुष्यात पहिल्यांदाच केली. सगळंच अगम्य होतं, त्यात किराण्यावाल्याचे हजार प्रश्न. “ताई, तांदूळ कोणता पाठवू?” भाताचा, हे सोडून उत्तरच सुचेना. “पोहे-जाडे की पातळ?, रवा बारीक की जाडा?” आता पदार्थांच्या शरीरयष्टीचीही अशी सर्रास चर्चा होऊ शकते, हेच तिला माहिती नव्हतं. मग परीक्षेत उत्तरं येत नसताना वापरायची तीच strategy तिनी वापरली. बिनधास्त ठोकून द्यायचं, मनाला येईल ते- दुकानदाराला काय माहिती, तिला माहिती नाहीये. घरी सामान आलं की बघून घेऊ…
तर अशा नव्या नवलाईनी तिनं किराणा आणल्यावर, आपणही घरात काहीतरी भन्नाट करावं असं त्याला वाटू लागलं. रोजच्या स्वंयापाकाला मावशी होत्याच, पण स्वयंपाकघरात फक्त तिच्याकडूनच अपेक्षा नको, म्हणून सुरूवात आपणच करावी ह्यावर आईशी तास-दीड तास चर्चा केल्यावर उपमा करून तिला surprise द्यावं, असं त्यानं ठरवलं. रेसिपी स्टेप बाय स्टेप लिहून घेतली. एक दिवस तो हाफ डे घेऊन लवकर घरी आला, अर्धा दिवस खपून उपमा केला. पण हाय रे कर्मा, तो उपम्यासारखा दिसेच ना. झाकण ठेवलं, काढलं, परतलं तरीही तो घट्टच होईना. त्यात लॅच उघडल्याचा आवाज! त्यानं पटकन गॅस बंद केला आणि बाहेर येऊन बसला.
“अगं, आता तुझ्याआधीच आलो जस्ट. मावशींनी गरम गरम केलंय काहीतरी, चल जेवून घेऊ. ये पटकन हात-पाय धुवून.” ती येईपर्यंत त्यानं ताटं मांडली आणि तिच्या कौतुकात न्हाऊन घ्यायला उत्सुक होऊन बसला. ती आली आणि म्हणाली, “अरे, पोळी नाही वाढलीस?” “पोळी?”
“पिठलं आहे नं हे?”

तिळ-गूळ!

 


एकदा कपडे घ्यायला मॅालमधे गेले होते. कपड्यांचा ढीग घेऊन ट्रायल रुममधे गेले. हा टॅाप घालून बघ, नाक मुरडून दुसरा घालून बघ, असं करता करता अचानक माझा खरेदीचा मूडच गेला. सगळे कपडे चुकीच्या साइझचे वाटू लागले. मग ह्या दुकानात माझ्या देहयष्टीला सुडौल भासवणारे ब्रॅन्ड्सच नाहीत, असा मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला. सगळा पसारा आवरून बाहेर पडणार तितक्यात कानावर गोड हिंदी आलं. “अजी, सुनते हो. तुस्सी देखलो इक वार. थोडी मोटी तो नही लगदी?” परदेशात राहून दोन दशकं उलटलीयेत, तरीही आपली भाषा ऐकली की, पटकन मन भारतात जाऊन पोहोचतं. परदेशात असल्यानी त्या दोघांनाही, “आपली भाषा कोणाला कळणार आहे, बोला बिनधास्त!”, असा एकप्रकारचा आत्मविश्वास असावा. त्यात मी भसकन् बाहेर पडून त्यांचा पचका करू नये, असं वाटून मी त्या २X२ च्या ट्रायल रुममधे बसून राहिले. आत बसून भिंतींना कान असतात ह्याच्ं प्रात्यक्षिक करू लागले. आता तो काय म्हणतो ह्याकडे माझं लक्ष होतं. “जैसे हो, वैसेही दिखना है आपको. बस करो अब…” असं वाक्य कानावर आल्यावर पटकन बाहेर जाऊन न बघितलेल्या तिला सांगावंसं वाटलं, “तुस्सी वड्डे सोणे लग रहे हो ज्जी” अगदी पोटतिडकीनी तिला लेक्चर द्यायचा मोह मला होत होता की, बाई आता तरी

आपण कसं दिसतोय, हे स्वतःला न विचारता दुसर्यांच्या नजरेतून आपलं सौंदर्य बघण्याची सवय सोड आता! पण तेवढं पंजाबी सोडा, हिंदीही बोलणं मला झेपलं नसतं. त्यामुळे मी मुग गिळून ते दोघं जाण्याची वाट बघू लागले. तेवढ्यात तिनी ठसक्यात ऐकवलं, “तुस्सी तो रेहनेही दो, बैठे रहो चुपचाप। मैने तो डॅाली के साथही आना था शॅापिंगवास्ते, इक्क तो फॅशन सेन्स नही है आपको, और गल कर रह्हे है।”

त्यांचा तिळ-गूळ असा काही जमला होता की, बत्त्याने फोडूनही फुटला नसता! मी राजरोसपणे रुमच्या बाहेर पडले. ती आतमधून तडतडतच होती, तर तो गपगुमान त्याला दिलेल्या स्टुलावर गूळ लावल्यासारखा चिकटून बसला होता.

स्वप्नातल्या कळ्यांनो…

 


खूप वेळा वाटतं की, तुला एकदा विचारून टाकावं. तुझ्यासाठी मी नक्की कोण आहे? ओळख, मित्र, जवळचा मित्र की त्याहीपेक्षा वेगळं काही? पण पुन्हा एकदा विचार येतो, न जाणो तू खरं बोललीस आणि तुझं सत्य मला पचवता नाही आलं तर? आहे का माझी तयारी, तुझ्या मनातलं जाणून घेण्याची, की माझ्या जागेपणीच्या स्वप्नातलीच तू खरी आहेस? आताशा तर खरं काय आणि माझ्या मनातलं काय ह्याच्या सीमारेषाही धुसर होत चालल्या आहेत. ह्या न संपणार्या स्वप्नातून मला स्वतःला उठवायचंच नाहीये.

सगळे आजूबाजूला असतानाही मी सिगरेट हाती घेतल्याबरोबर तुझा नापसंतीचा कटाक्ष मला कळून आपोआपच मी आपसूकच ती सिगरेट परत ठेवून देतो, तू मात्र नामानिराळी राहून चहाचे घुटके घेत गालातल्या गालात हसत राहतेस.

तासन्तास आपल्या गप्पा रंगलेल्या असतात. आपल्या ह्या जगावेगळ्या मैत्रीला कोणी नावं तर ठेवणार नाही नं, ह्या विचारानं मी कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे बघत राहतो. माझं लक्षच नाहीये असं वाटून वैतागून तू निघून जातेस, अन् तुला माझ्या मनातल्या भावना का नाही कळत म्हणून धुसमुसत राहतो.

मी खुलून बोलावं म्हणून तू डिवचत राहतेस, आणि तुला सगळं कळूनही तू न कळल्याचं दाखवतेस म्हणून मी तणतणत राहतो. माझ्या ह्या अशा वागण्यानं हल्ली तू दुरावते आहेस. पण खरंच दुरावते आहेस की, कधी जवळच नव्हतीस?

सांग नं गं एकदा, मी कोण आहे तुझ्यासाठी? पण नको, तो प्रश्नही नको, अन् तुझं उत्तरही नको. मी असंच मनापासून आजन्म तुझ्यावर प्रेम करत राहीन, बंधनात न अडकता. तुझ्या आवडत्या गाण्यासारखं-

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा,

गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा…”

 

दिल है हिंदुस्थानी- आमंत्रण



आता शाळा संपून उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. उन्हाळ्यात बरेच जण कुठे ना कुठे प्रवास करत असतात, त्यामुळे जवळपास दोन महिने फारशी कोणाची भेट होणार नाही. तर त्या आधी एकदा भेटी व्हाव्या म्हणून इथे अमेरिकेत  “समर पार्टीज” सुरू झाल्या आहेत. आम्हा भारतीयांच्याही भेटी-गाठी होतायेत, तर मुलांच्या शाळांमधल्या अठरापगड मित्र-मैत्रीणींच्याही पार्ट्या होतायेत. अशावेळी काही फरक प्रकर्षाने जाणवतात. 


आपले भारतीय आमंत्रण करतानाच, तुमच्याकडे कोणी पाहुणे आले असतील तर त्यांनाही घेऊन या नक्की, असं आग्रहानी सांगतात  कोणाचे आई-बाबा/सासू-सासरे/ पर-राज्यातील बहीण-भाऊ/मित्र-मैत्रीण असं कोणीही तुमच्याकडे आलं तर त्यांनाही आमंत्रण करतात. आयत्या वेळेलाही तुम्ही बिनधास्त इतर कोणालाही घेऊन जाऊ शकता. सगळ्यांचंच आपुलकीने स्वागत होतं. कोणाकडे जायचं असलं की, रिकाम्या हातानी कसं जायचं, ह्या संस्कारांनी भारतीय काही ना काहीतरी घेऊनच एकमेकांकडे जातात. “ह्याची काय गरज होती, कशाला -कशाला…”, म्हणून त्या भेटवस्तू स्विकारल्या जातात. आल्या-आल्या पाणी/सरबत/पेयपानानी जी पाहुणचाराला सुरूवात होते ती बडिशोप/पान/दर्दी लोकांच्या चहानीच संपते.  मध्यंतरात काही-ना-काही खायला-प्यायला येतच राहतं, आणि प्रसादाला नाही म्हणू नये तसं ते पोटात ढकलंलंही जातं. सरते शेवटी, लोणच्याच्या बरणीत कसं हलवून हलवून तेल टाकलं जातं, तसं आईसक्रीम किंवा तत्सम गोड पदार्थ ठोसले जातात. सगळ्याचाच आग्रह असतो किंवा किमान प्रत्येकाला आवर्जून हे घेतलं का-ते  घेतलं का, अशी प्रेमळ विचारपूस असते. 


त्याउलट अ-भारतीयांकडे जायच्या आधीच मेनूला काय असणार आहे ते, तुम्ही तुमची-तुमची दारूची सोय करा (BYOB== Bring Your Own Bottle/Beer)-आम्ही हे-हे देणार आहोत!  येण्याची वेळ- पार्टी संपण्याची वेळ, +१ घेऊन यायचंय की तुम्ही एकट्यानेच जायचंय, ह्या सगळ्या प्रकारचे तपशील दिलेले असतात. उगाच संभ्रम नको, आणि कोणाचाच खोळंबा नको. अनौपचारिकपणा इतका की, खाण-पिण समोर ठेवलेले असतं. ज्याला जेव्हा हवं, जे हवं ते घ्या आणि खायला लागा. कोणी येऊन "जेवण लागलंय, करा सुरुवात सगळ्यांनी", असं सांगायला येईलच अशी शाश्वती नाही. सुरुवातीला तर मी समोर सगळं असूनही कोणी घ्यायला ना सांगितल्याने उपाशी घरी परतलेय! 


अमेरिकेत जन्म झालेल्या न् वाढलेल्या माझ्या मुलीला तिच्या शाळेतल्या एका मैत्रिणीकडे आज जायचं होतं तर माझं आपलं, "काहीतरी गिफ्ट घेऊन जा, किमान उन्हाळ्याचं आईस्क्रिम तरी घेऊन जा...", असं  चालू होतं. त्यावर तिनी शांतपणे सांगितलं की मी आधीच विचारलंय की मी काही घेऊन येऊ का, तर ती नाही म्हणालीये. तर मी काहीच घेऊन जाणार नाहीये. जाता -जाता तिच्या शैलीतला शालजोडीतला तिनं टाकलाच, “ No one is going to shove food the moment you walk in, you know!”


#proudToBeIndian

Saturday, May 21, 2022

एका चहाची गोष्ट



पाऊस कोसळत होता, आणि मी घरी अक्कलदाढ काढल्याने गाल फुगवून शांतपणे पाऊस बघत बसले होते. मनात नेहमीसारखाच तू होतास. हल्ली तर वेळा-काळाचं भान न ठेवताच तू समोर येऊन ठाकतोस आणि माझ्याही नकळत चेहऱ्यावर ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत हसू पसरत जातं. मग आई किंवा ताई विचारते, "काय गं, एकटीच काय हसत बसलीयेस? बरी आहेस नं ?"

 मागच्या सहा महिन्यात तुझ्याशी झालेल्या गप्पा, तुझे सूचक बोलणं, माझं फोनवरच लाजणं, आणि मनाशी आपले संवाद घोळवत राहणं ह्याचा सध्या नादच लागला होता. घरी सगळे झोपले की हळूच फोनची केबल काढून बेडरूम मध्ये न्यायचा आणि अंधार करून तासनतास तुझ्याशी फोनवर बोलत बसायचं. मध्ये आई उठलीच तर काही नाही रॉंग नंबर आला  होता, असं काहीबाही कारण सांगून पटकन ठेवून द्यायचा. मांजर दूध पिताना डोळे झाकून पिते, पण जगाला कळायचं ते कळतंच. त्यात आई-बाबा वयात आलेल्या मुलं-मुलींवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवून असतात, हे स्वतःची मुलं त्या वयात येईपर्यंत कळत नाही. त्यामुळे त्यांना सांगितल्यावर ते काय म्हणतील, ह्या भितीनी पोटात गोळा उठत होता. आज सांगू-उद्या सांगू असं ठरवत घरी सांगण्याची हिम्मत काही केल्या होत नव्हती. 

दर वर्षी पाऊस सुरु झाला की लाईट जाणं  किंवा फोन बंद पडणं हे अंगवळणीच पडलं होतं. त्यासगळ्याचा ह्या आधी कधी त्रासही झाला नव्हता. पण ह्या वर्षी मात्र माझ्या आवडत्या पावसावर मी रागावले होते. फोन रुसून बसलेला, त्यात अक्कल दाढ काढल्याने खूप दुखत होतं. कॉलेजला जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्या काळात असे टेक्स्ट मेसेजेस, सेल फोन असे चोचलेही  नव्हते.  त्यामुळे तुझ्याशी बोलताही येणार नव्हतं. किती दिवस? त्याचाही अंदाज नव्हता. तुझी खूप खूप आठवण येत होती, पण सांगणार कोणाला, आणि करणार काय? उगाच, "माझ्या डोळ्यातला पाऊस, आकाशातून कोसळताना बघ.." अशा आशयाच्या फिल्मी कविता सुचत होत्या. 

सगळीकडे पाणी साचून लोकल बंद पडल्या होत्या. घरचे सगळेच सुखरूप घरी पोचले होते. आईनी मस्तपैकी कांदा  भजी तळायला घेतली होती, जी मला आज खाता येणार नव्हती. मग तर गालावरची सूज आणखीनच वाढली. आणि तेवढ्यात बेल वाजली. आता कोण तडमडलं, असा विचार करून दार उघडून बघितलं तर नख-शिखांत भिजलेला तू एका हातात हेल्मेट आणि यलो रेन जॅकेट घालून मिश्किल हसत उभा होतास!! क्षणभर मला कळलंच नाही की, नेहमीसारखा भास आहे की, खरंच तू आहेस. तेवढ्यात आई मागनं आली, "कोण आलंय गं?", विचारत. तोंडातल्या कापसाच्या बोळयामुळे काही बोलताही येत नव्हतं, त्यामुळे नुसतेच  हवेत हातवारे करत राहिले. ह्याक्षणी धरणी मातेने दुभंगून पोटात घ्यावं असं वाटत होतं. एकाच वेळी अत्यानंद आणि भितीनी माझ्या चेहऱ्यावर नेहमीचेच बावळट भाव आले असणार. मग तूच बोलायला सुरुवात केलीस, "मी सौरेश, नेहाचा मित्र. आत येऊ का?" कप्पाळ, आजपर्यंत माझा एकही मित्र कधी घरी आला नव्हता. इन फॅक्ट, मला मुलांशी बोलताच यायचं नाही, त्यामुळे एकही मित्रच नव्हता. आणि हा बिनधास्त सांगतोय की मी नेहाचा मित्र! एव्हाना सगळे हॉलमध्ये जमले होते आणि मला कोणाच्याच नजरेला नजर देण शक्य नसल्याने मी वेन्धळयासारखी दार धरून पाऊस काही सुचवेल का ह्याकडे बघत उभी होते. त्यानंतर समोर काय घडतंय ह्याकडे एक मूक प्रेक्षक म्हणून बसण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. तू मात्र अगदी रोजचं येणं जाणं असल्यासारखा सगळ्यांशी बोलत होतास. तुला बाबांनी  टॉवेल, त्यांचे कपडे बदलायला कधी दिले आणि तू फ्रेश होऊन कधी किचनमध्ये जाऊन भजी खात आईशी गप्पा मारायला लागलास, हे कळलंही नाही. मी आपली दिङगमुखासारखी इकडून तिकडे फिरत होते. आई-बाबा, ताई सगळेच तुझ्याशी गप्पा मारण्यात दंग होते. आणि अचानक बाबांच्या लक्षात आलंच की  हा परका मुलगा एवढ्या पावसाचा आपल्या घरी कशाला आला  आहे, हे तर आपण विचारलंच  नाही. हा आपला आल्यापासून सगळ्या विषयांवर गप्पा मारतोय आणि आपण काहीच विचारलं नाही. मग त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. ह्यानी पण अगदी सहजतेने सांगितलं, "काका, झालं  काय की मी हिच्यासाठी लायब्ररीतून रेफरन्सचं पुस्तक आणलं होते. पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे नं. तर नेमका पाऊस सुरु झाला आणि ही कॉलेजला पण आली नाही नं आज. मग तिचा अभ्यास वेळेत व्हयायला हवा ना. म्हणून मग मीच आलो पुस्तक द्यायला." आई आपली गालातल्या गालात हसत होती. मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे बघत  होते.  बाबाही अगदी पटल्यासारखे मान हलवत होते, मनातं म्हंटलं सुटलो आता. 

बाबांनी मग आईकडे चहाची फरमाईश केली. आमच्या घरी चहा म्हणजे एक सोहळा असतो. त्यासाठी योग्य प्रमाणात आलं कुटून घ्यायचं, तुकडे करून किंवा किसून नाही चालत. असं छान पाण्यात उकळायचं, काढ्याइतपत नाही. मग त्यात माफक साखर विरघळेपर्यंत एक उकळी काढायची. त्यात आता चहा पावडर टाकून झाकण ठेवून तो चहा दबू द्यायचा. तोवर दूध वर येईपर्यंत उकळून घ्यायचं. मग दुधावर साय धरायच्या आधी ते चहात गाळायचं. दुधाचं प्रमाणही ठरलेलं, चहाचा गुलाबी रंग तर हवा पण दूधपाक नको, तसाच पाणचटही नको. आजीनी ठरवून दिलेली ही चहा करण्याची कृती पिढ्यानपिढ्या इकडची तिकडे झाली नाहीये. आणि असं असताना सौरेशनी एकदम म्हंटलं, "थांबा काकू, मी करतो चहा. तुम्ही बसा  शांत." एरवी आमच्याकडे कोणीही आलं तरीही आई चहा मात्र स्वतःच करायची, तर आज तीही अगदी लगेच पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच ओट्यापासून लांब झाली. मी आपली बघतच राहिले. 

बाबांनीही मला आणि ताईला हॉलमध्ये पपेरमध्ये आलेली बातमी दाखवायला बोलावलं. छातीतली धडधड आता शेजारच्यांनाही ऐकू जाईल असं  वाटत असताना सौरेश सगळ्यांसाठी चहा घेऊन बाहेर आला. थरथरत्या हातांनी कप ओठांना लावला आणि काय आश्चर्य अगदी आईसारखाच चहा झाला होता! (आम्ही हॉलमध्ये असताना आईनी चहा कसा करायचा हे तुला शिकवलं होतं, हे खूप उशिरा कळलं.) बाबांनी मस्त डोळे मिटून आधी चहावर येणाऱ्या वाफेचा खोल श्वास घेतला, आणि पहिल्या घोटातच सौरेशच्या पाठीवर थाप मारून, "पसंत आहे मुलगा!", अशी दाद दिली. आम्ही दोघे गोंधळून त्यांच्याकडे बघायला लागलो. आईनी मला विचारलं, "हाच ना तो रात्रीचा रॉंग नंबर? आणि काय रे पुस्तक द्यायला आलेलास ना, पुस्तक कुठेय?" ते ऐकल्यावर आपली चोरी पकडल्याचं आम्हाला दोघांनाही कळून चुकलं.   


Thursday, May 19, 2022

करशील एवढं?


     

आता भेटशील ना तेव्हा समोर समोर बसून तुझ्याशी बोलायचंय, असे कित्ती वेळा ठरवलंय आणि तू समोर आल्यावर मात्र शब्दांना ओठांवर येण्यापासून थोपवलंय. आयुष्यात चढ-उतार होत राहतात, कोणी येतं -कोणी जातं पण तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत. कधी कधी हक्कही गाजवावासा वाटतो पण त्याचा अधिकार मला नाही हेही कळतं.  कधी-कधी खूप एकटं वाटत असतं, तू साद घालावीस आणि ते मळभ घालवावं असंही वाटतं. पण तुला ते मी ना सांगताही कळावं, अशी वेडुली ईच्छा असते. आणि खरंच तूही त्याच वेळी नेमका माझ्या वाटणीस येतोस. लुटुपुटुची भांडणं होतात, थोडासा हक्क गाजवला जातो. आणि अचानक लक्ष्मण रेषेची आठवण होते. तोल जाण्याआधीच सावरला जातो. तू तुझ्या विश्वाची मला आठवण करून देतोस, त्यात माझं अस्तित्वच नाहीये ह्याची जाणीव करून देतोस. का रे असा दुष्टासारखा वागतोस? तुझ्याशी मग संवादच खुंटतो. तुझं क्षितिज तुझ्यापाशी सुखरूप आहे, त्यात मी कधीच येणार नाहीये. पण तरीही कुठेतरी कल्पनेतच का होईना मला तू हवा आहेस. सुख-दुःख वाटून घ्यायला, माझा सखा म्हणून. जो मला नेहमी आणि नेहमी फक्त समजून घेईल, ज्याच्या खांदयावर मी डोकं ठेवून निर्धास्त होईन. ज्याच्या फक्त असण्यानीच माझं  हसू मावळणार नाही. ज्याच्याकडे मला स्वातंत्र्य मागावं नाही लागणार तर ते आपसूकच दिलं जाईल. मलाही निर्णय घेता येतात, ह्याचा आत्मविश्वास निर्माण होईलही कदाचित. माझ्यावर बोट उचलून बोलण्याची कोणी हिम्मतच नाही करणार, कारण ढालीसारखा तू असशील माझ्याबरोबर!

तुलाही माहितीये मलाही माझा परीघ सोडता येणार नाही, पण त्याच परिघात तू सामावून गेलायेस रे. तसंच  तुझ्याही क्षितिजावर लुकलुकणारी चांदणी म्हणून कधीतरी आकाशाकडे मान वर करून बघत जा माझ्याकडे अधून-मधून. समुद्राच्या लाटांनाही  माहित असतंच ना की, किनाऱ्याची कितीही आस असली तरी साथ क्षणभराचीच असते. पण त्यांची ओढ काही कमी होत नाही नं? 

फक्त एक करशील? जे आहे ते नाकारू नकोस, जे माझ्या कल्पनेत आहे ते तुझ्याही ओठांवर येऊ दे. ते कधी नव्हतंच, फक्त वल्गना होत्या असा बेईमानपणा स्वतःशी तरी करू नकोस. स्वीकारलं नाहीस तरी अवहेरू नकोस. करशील एवढं? माझ्यासाठी?

श्यामची आई

 


मराठी माणसाला श्यामच्या आईची वेगळी ओळख करून द्यायला नको खरं तर. पण तरीही सांगते, साने गुरुजींनी लिहिलेली "श्यामची आई" हे पुस्तक पिढ्यानपिढ्या मराठी घरा-घरांमधे संस्काराचा एक अविभाज्य भाग म्हणून वाचलं जातंय. तिची एक गोष्ट नेहमीच आमच्या घरी वादग्रस्त ठरली आहे. आधी मी माझ्या आईशी त्या गोष्टीवरून वाद घालायचे, आता माझी मुलं माझ्याशी सहमत नाहीयेत. एकदा काय होतं  की, श्यामला पोहता येत नसतं, आणि त्यामुळे त्याचे सगळे मित्र त्याला चिडवत असतात.  त्याची आई श्यामला मारून मुटकून पोहायला पाठवून देते. सरते शेवटी श्यामला पोहायला येऊ लागते, पण तो आईवर खूप रागावलेला असतो. त्यावर त्याची आई त्याला म्हणते, "अरे श्याम, दुसऱ्या कोणी तुला भित्रा म्ह्णून चिडवू नये म्हणून मी तुला मारलं रे. तुझ्या आईला कोणी म्हणलं  की, तुझा मुलगा किती भित्रा आहे, तर तुला आवडेल का?" आणि श्यामला हे पटलं सुद्धा!

माझ्या मुलांनी जेव्हा ही  गोष्ट ऐकली तेव्हा त्यांना हे अजिबात पटलं नाही. ह्या पिढीला शाब्दिक मार जरी ओळखीचा असला तरी कोणी खरोखर छडीने मारून संस्कार करतं हे पटणं कठीणच आहे. आमची पिढी जरी मार खाऊनच सुसंस्कारित झाली असली तरीही आईनी असं पोहता येत नसताना सगळ्या मित्रांसमोर झोडून काढणं आणि विहिरीत ढकलून देणं जरा अमानुषच वाटायचं. त्यामागची भावना आईनी समजावून सांगितली तरीही स्वतः आई झाल्याशिवाय ते काही पचनी पडलं नाही.

बऱयाचदा आई म्हणायची, "हे शिकून घे, ते कर नाहीतर सासरी माझी लाज काढशील!" हा बऱ्याच आयांचा अगदी आवडता डायलॉग असायचा. मानस शास्त्रात सुद्धा  प्रौढपणीच्या मानसिक समस्यांचे मूळ बालपणात असतं, अशी धारणा आहे. म्हणजेच  बालवयातले आईचे संस्कार आपल्याला आयुष्यभर पुरून उरतात. मध्ये एकदा बदक आणि त्याचं पिल्लू ह्यांची एक व्यंगचित्रांची मालिका आहे, ती वाचत होते. त्यात ते पिल्लू मोठ होऊन मानसिक उपचारांसाठी डॉक्टरांकडे गेलेलं असतं. त्याला तीन ह्या अंकाची खूप भीती वाटत असते. काही केल्या कळत नाही असं का होतंय. शेवटी त्याला संमोहित करून लहानपणीच्या आठवणी काढायला सांगतात. तेव्हा त्याला आई दिसते. ती ओरडत असते, "येतोयस की मी येऊ? एक, दोन, ..."

ह्यातला विनोदाचा भाग सोडला तरीही, आईने केलेले संस्कार कायमच लक्षात राहतात. बरेचदा आयांना वाटते की मुलांचं  यश त्यांच्या कर्तृत्वावर मिळालय पण त्यांच्या लहानातल्या लहान चुकांचं  खापर मात्र त्या स्वतःवर फोडून घेताना दिसतात. आणि ह्यामुळे कदाचित मुलं कितीही मोठी झाली तरीही आया त्यांच्या चुका काढणं काही थांबवत नाहीत. गंमत सांगते, माझ्या ओळखीच्या एक काकू आहेत. त्यांनाही आता सून आलीये. पण त्या काकूंची आई अजूनही त्यांना चारचौघात, "बास  एवढं तूप घेऊ नकोस, जाडी होशील." "हा रंग शोभत नाही तुझ्या रंगावर, केवढी काळवंडली आहेस!", असं आणि बरंच काही बोलत असतात. त्यांच्या लक्षातही येत नाही की आपली  मुलगी आता स्वतः सासू झालीये, आजी झालीये. आता तिला शिस्त लावण्याचे दिवस गेले आहेत. त्यांच्या डोक्यात श्यामच्या आईनंच घर केलेलं असतं. 

अशा कितीतरी श्यामच्या आया आजूबाजूला दिसतात. पण त्यामुळे त्यांची मुलं त्यांच्या शब्दांनी दुखावतात. आई नेहमी चूकच काढते, अशी समजूत करून घेतात. आईला मी कधी कळणारच नाही, ह्या समजुतीनं तिच्यापासून नकळत अंतर वाढवत जातात. काळाच्या ओघात जेव्हा स्वतःवर आईपण येत आणि आपण आईचेच शब्द बोलायला लागतो तेव्हा किंवा काही अभाग्यांना आई काळाच्या पडद्याआड जाते तेव्हा तिच्यातली श्यामची आई उमगत जाते.